आजच सकाळी मला सकाळी ६.४५ मि. आईने मला गिशुला घाटकोपर स्टेशनला सोडण्य़ास सांगितले, मी आरे कॉलनी जवळ राहत असल्याने सकाळ्च्या थंडीला तोंड देण्यासाठी मी आणि गिशु तयारीनिशी निघालो. जलशुध्दीकरण केद्रांच्या शेजारुन गाडीने भरधाव निघालो असतानाच एक १७-१८ वर्षाचा मुलगा मोठा दगड मोठ्या मुश्किलीने घेऊन पळतोय तो अचानक थांबला आणि त्याने तो दगड ताकदीनिशी वर उचलुन जमिनीवर धाडदिशी आपटला, त्याच दणक्या बरोबर एक साप जिवाच्या आंकांताने वर उडाला पण अंगावर पडलेल्या त्या मोठ्या दगडाने त्याच्या शरीराचे दोन तुकडे केले होते. माझ्या संतापाने त्यामुलाच्या आई बहीणींचा आणि त्याचा उध्दार केला पण त्या मुलाच्या दॄष्टीने ती एक अभिमानाची बाब होती की त्याने एका सापाचा जीव घेऊन येणा-या जाणा- या लोकांचा जीव वाचवला होता त्याने तसे बोलुन दाखविले होते. त्यावेळी पटकन मला बुलेट थेअरीची आठवण झाली, एखादी गोष्ट व्यक्तीला वारंवार सांगुन किंवा वारंवार त्यातील चांगले किंवा वाईट गुण त्याला पटवले जातात त्यावेळी ती व्यक्ति ती गोष्ट खरी आहे असे मानु लागते, यामुलाच्या बाबतीत किंवा तुमच्या बाबतीत समाजाने ज्या चुकीच्या गोष्टी तुमच्या मनामध्ये बिंबवल्या आहेत त्या तुम्ही मरेपर्यंत आचरणात आणणार आणि तुमची पुढची पिढी ती आचरणात आणॆलच एवढी खात्री करुनच तुम्ही मरणार, तो साप याच समाजाच्या संकल्पनांचा बळी होता. शाळेत असतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी साप कसा पकडला याचे वर्णन केले आहे आहे पण तो सोडला याचे वर्णन केले नाही. चित्रपटांपासुन ते जाहीरातीमध्ये साप म्हणजे मृत्यु असाच देखावा निर्माण केला आहे. त्यामुळे साप दिसला की ठार करा हे समीकरणच आहे.
जोपर्यंत आपण या गोष्टी चुकीच्या म्हणुन बंद करत नाही तोपर्यंत सापांचा जीव असाच जात राहणार आणि एकदिवस फ़क्त हट्टापायी आपण या सुंदर जीवाला कायमच हरवुन बसणार.